वणीत डासांचा प्रादुर्भाव वाढला

मलेरिया आणि डेंग्युचा धोका

0 11

जब्बार चीनी, वणी: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. तुंबलेल्या नाल्या साचलेले पाणी, रस्तावरील सांडपाणी यामुळे मागील काही दिवसांपासून वणी शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे वणीकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. डासांच्या प्रादुर्भावामुळे ताप, मलेरिया यासारख्या रुग्णातही वाढ झाली आहे. यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर वणीतही डेंग्यू सारखा आजार थैमान घालू शकतो.

जुलै महिन्यात वणीमध्ये ब-यापैकी पाऊस झाला आहे. या महिन्यातही गेल्या आठवड्यापासून दररोज पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. काही प्रभागात तर नालीचे सांडपाणीही रस्त्यावर वाहत असल्याने तिथे डबके साचले आहे.

राज्यात प्लास्टिक बंदी असली तरी शहरातील सांडपाणी वाहून नेणा-या अनेक नाल्यांमध्ये प्लास्टिक तुंबून सांडपाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून वणीतील सर्वच प्रभागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

विठ्ठलवाडी परिसर, जैन ले-आऊट, रवी नगर, प्रगती नगर, देशमुखवाडी, इंदीरा चौक परिसर इ प्रभागात तर डासांनी चांगलाच हैदोस घातला आहे. डासांची उत्पत्ती सातत्याने वाढत असल्याने ताप, मलेरिया यासारख्या रुग्णात वाढ झाली आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगरपालिका व आरोग्य विभागाने आताच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा आता कोरोनासह डेंग्यूच्या रुग्णातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काय आहेत डेंग्यूची लक्षणे ?
ताप येणे, मळमळ वाटणे, उलटी होणे, डोके दुखणे, शरिरातील ज्वाईंट दुखणे. तसेच रुग्णामध्ये सुरुवातीला आढळलेली लक्षण मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णात सारखी आढळतात. मात्र डेंग्यू असला तर थंडी वाजत नाही तर मलेरियात मात्र थंडी वाजून ताप येतो. डेंग्यूमध्ये रक्ताच्या पांढ-या पेशी कमी होतात, रक्तदाब कमी होतो, अंग थंड पडते, रुग्ण बेशुध्द होतो, त्वतेच्या आत रक्तस्त्राव होतो, अंगावर लाल चट्टे पडतात. अशावेळी रुग्णांची रक्तचाचणी करून उपचार केला नाही तर हा रोग वाढू शकतो. परिणामी रुग्णाला जीवही गमवावा लागू शकतो..

डेंग्यूचा डास दिवसा चावतो
मलेरिया पसरविणारे डास कधीही चावा घेतात. मात्र डेंग्यूचे डास सकाळी किंवा दिवसाच चावतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळ होण्याआधी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

काय करावे लक्षणं आढळल्यास
डेंग्यूचे प्राथमिक लक्षणे आडळले की ताप येण्याच्या रोग्णाने दुस-या- तिस-या दिवशीच रक्ताची चाचणी करुन घ्यावी. त्यानंतर घरी आराम आणि नियमीत औषधोपचार घ्यावा. बेशुध्द होणे सारखे लक्षणं असल्यास डॉक्टरांच्या देखरेखीखालीच उपचार घ्यावा लागतो. रुग्णांच्या रक्तात पांढ-या पेशी टाकाव्या लागतात व नियमीत रक्त द्यावे लागते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.