मराठ्यांच्या ओबीसीत समावेश करू नका… 11 फेब्रुवारीला वणीत विराट मोर्चा

जातनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी (VJ,NT, SBC) आक्रमक

7

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मराठा समाजाल सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ‘ओबीसी’ मध्ये समावेश करू नये व जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी 11 फेब्रुवारीला उपविभागीय कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महिला समन्वय समिती, वणी-मारेगाव-झरी द्वारा या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

शासकीय मैदान, पाण्याची टाकी वणी येथून या एल्गार मोर्चा सुरू होणार आहे. वणीतील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करून या मोर्चाची सांगता शासकीय मैदान येथेच होणार आहे. मोर्चानंतर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध वक्ते डॉ. लक्ष्मण यादव, दिल्ली हे या सभेचे प्रमुख वक्ते आहेत. सभेनंतर शिष्टमंडळाद्वारे उप‌विभागीय अधिकारी, वणी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

बिहारच्या धर्तीवर राज्यात ओबीसींची जनगणना करा
गेल्या अनेक वर्षांपासून जातीय जनगणनेची मागणी होत आहे. मात्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. बिहारने ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय केली. बिहार राज्य हे करू शकते तर महाराष्ट्र का नाही? असा सवाल उपस्थित करीत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांची आहे.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका
मराठा समाजाच्या दबावामुळे राज्य सरकार मराठ्यांचा ओबीसीत समावेश करीत आहे. आधीच राज्यात ओबीसींची संख्या अधिक असून त्यांना आरक्षण कमी दिलेले आहे. त्यात आला मराठ्यांचा समावेश होत असल्याने ही बाब ओबीसीसाठी अन्याय‌कारक आहे. त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करू नये अशी देखील मागणी आंदोलकांची आहे.

या मोर्चाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.