मारेगाव नगरपंचायतवर सत्तेची चावी कोणाच्या हाती ?

काँग्रेस-सेनेची आघाडी की, सेना-भाजपची युती

11

भास्कर राऊत मारेगाव : नगरपंचायत निवडणुकीचे निकाल  21 जाने. रोजी  जाहीर झाले. मात्र मारेगाव नगरपंचायतमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी नेमके कोणते समीकरण जुडणार व नगरपंचायतची चावी कोणाकडे राहणार ? याकडे सर्व तालुकावासीयांचे लक्ष लागलेले आहे.

     मारेगाव नगरपंचायतच्या निकालामध्ये काँग्रेस पक्षाने 17 जागांपैकी सर्वात जास्त  5 जागा बळकावली. त्याखालोखाल शिवसेना आणि भाजपाने 4-4 जागा पटकावत दुसरे स्थान मिळवीले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  2, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1, तर अपक्ष 1 असे बलाबल सध्याच्या नगरपंचायतमध्ये पहावयास मिळत आहे.

राज्याच्या राजकारणाचा विचार केल्यास मारेगाव शहरात सुद्धा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सत्तेवर बसू शकतो. त्यासाठी काँग्रेस व शिवसेना दोन्ही पक्ष मनाने एकत्र येणे आवश्यक आहे.  दुसरीकडे जर जुनेच समीकरण जुळून आले तर सेना-भाजपा मिळून सत्ता स्थापन करू शकते.  असे एका भाजपा पदाधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगीतले.

नगराध्यक्ष पदावरुन प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास वेगळे समीकरण जुळते काय ? याचीही चाचपणी काँग्रेस पक्ष करीत असल्याची जोरदार चर्चा आहे. मनसेचे 2, राष्ट्रवादीचा 1आणि 1अपक्ष नगरसेवकाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करता येईल का? याचीही गोळाबेरीज सुरू झाली आहे.

नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणची प्रतीक्षा 

नगरसेवक पदासाठी जरी निवडणूक संपली तरी नेमके नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणाचे निघते ? यावर समोरची परिस्थिती अवलंबून राहणार आहेत. आरक्षण जाहीर होताच जुळवाजुळव करण्यास वेग येऊन खऱ्या अर्थाने नगरपालिकेच्या रणधुमाळीस सुरुवात होणार आहे. दरम्यान घोडाबाजाराला उधाण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.