रस्ता नसल्याने चिखल तुडवत जावे लागते अंत्ययात्रेला

हटवांजरी ते हटवांजरी (पोड) पक्का रस्ता नसल्याने नागरिकांचे हाल

17

सुरेश पाचभाई, बोटोणी: हटवांजरी येथे स्मशान भूमी कडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावक-यांना अंत्यसंस्कारासाठी चिखल तुडवित जावे लागते. हटवांजरी (पोड) येथे जाण्यासाठीही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र रस्ता नसल्याने पोडातील रहिवाशांना तसेच परिसरात असलेल्या शेतक-यांना हाल सोसावे लागत आहे.

हटवांजरी ही सुमारे 300 घरांची वस्ती असून गावाची लोकसंख्या सुमारे 1000 आहे. या गावामध्ये शेतकरी व शेमजूर वर्ग राहतो. हटवांजरी या गावाच्या स्मशानभूमीचे काम होऊन सुमारे 3 वर्षे झाले. स्मशानभूमी तर झाली. मात्र स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. सध्या असलेला रस्ता हा 8 वर्षां आधी करण्यात आला होता. मात्र या रस्त्याचे देखील काम अर्धवटच होते.

यात केवळ अर्धा किलोमीटर पर्यंत मुरुम टाकण्यात आले तर हटवांजरी पोड कडे जाणा-या मार्गाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या पोडाकडे 24 घरे आहेत. मात्र पोडाकडे जाणा-या मार्गावर साधे खडीकरणही करण्यात आलेले नाही. याच मार्गावर अनेक शेतक-यांचे शेत आहे. त्यामुळे शेतक-यांसह हटवांजरी पोड येथील रहिवाशांना रोज या मार्गानेच ये-जा करावी लागते. सध्या पक्का रस्ता नसल्याने चिखल तुटवित नागरिकांना या मार्गाने जावे लागते.

3 वर्षांपासून ग्रामपंचायतीवर प्रशासक राज
सध्या गावाचे ग्रामसेवक वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे सुमारे 3 वर्षांपासून ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्याच भरवश्यावर आहे. या बाबत हटवांजरी येथील ग्रापंचायतचे प्रशासक संदीप वाघमारे यांना ‘वणी बहुगुणी’ने संपर्क साधला असला त्यांनी सदर रोड हा MRGS मधून मंजूर असल्याची माहिती दिली. सध्या पावसाळा असल्याने काम करता येत नसल्याने पावसाळा संपताच कामाला सुरूवात करू असे आश्वासन त्यांनी दिले.

या रस्त्याचे काम लवकराच लवकर करावे अशी मागणी गावातील ब्रम्हदेव मारोती जूनघरी, विजय गिरीधर कालेकर, लोकेश अर्जून हेपट, संतोष तुकाराम मेश्राम यांच्यासह गावक-यांनी केली आहे.

हे देखील वाचा:

प्रेमात पडून हाताशी धरला ‘यार’, नव-याच्या हत्याकांडात बायकोच सूत्रधार

पिसाळलेला कुत्रा चावल्याने बालिकेचा मृत्यू

राजूर ग्रामपंचायत बनले समस्यांचे आगार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.