भूमिअभिलेख कार्यालयात दाम करी काम !

दुपारी 3 नंतर कर्मचा-याची 'प्रताप' गडावर चढाई...

0 11

नागेश रायपुरे, मारेगाव: नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या मारेगाव येथील भूमीअभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभाराची आधीच चर्चा असताना आता सध्या या कार्यालयात ‘दाम करी काम’च्या चर्चेची भर पडली आहे.  येथील अधिकाऱ्यांसह कर्मचा-यांच्या अडेलतटू धोरणामुळे येथील अनेक प्रकरणे वर्षा पासून प्रलंबित आहे. प्रलंबित प्रकरणे निकाली लागण्यासाठी नागरिक तिथे जातात मात्र ‘दाम तरच काम’ अशी परिस्थिती या कार्यालयाची असल्याचा आरोप होत आहे. परिणामी काम होत नसल्याने  नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

भूमिअभिलेख कार्यालयातुन मिळणाऱ्या अनेक कागदपत्रासाठी नागरिकांना पायपीट नित्याचीच बनली आहे. कार्यालयीन वेळेत कर्मचारी तर सोडाच अधिकारी सुद्धा 12 ते 1 वाजता येत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.  काही कर्मचारी तर कार्यालयात 12 वाजता येऊन 3 वाजेपासूनच जवळच असलेल्या ‘प्रताप’ गडावर चढाई करतात. मात्र ‘चढे’पर्यंत कार्यालयीन वेळ संपलेली असते. त्यांचे हे ‘प्रताप’ सध्या चांगलेच चर्चीले जात आहे.  

येथील फेरफार, मोजणीचे अनेक प्रकरणे गेल्या अनेक वर्षा पासून प्रलंबित असून ज्यांनी कामाची दमडी दिली त्याचीच कामे होत असल्याचा आरोप होत आहे. येथील एक वादग्रस्त कर्मचा-याची बदली झाली असून त्यांचे जागेवर येथे नवीन कर्मचारी रुजू झाला आहे. हा कर्मचारी प्रलंबित असलेल्या फेरफार नोंद घेण्यासाठी राजरोसपणे 5 ते 10 हजार रुपयांची प्रत्यक्ष मागणी करत असल्याची इथे आलेल्या नागरिकांची ओरड आहे. 

भूमि अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  याकडे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष द्यावे. तसेच प्रलंबित कामे पूर्ण व्हावी अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहे. 

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.