वृक्षलागवडीची रोपे फेकली तलावात

शिरपूर ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणाचा कळस

0 677

विलास ताजने, मेंढोली: राज्यात वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. त्याला आळा घालण्यासाठी राज्यात आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१२- १३ मध्ये शतकोटी वृक्षलागवड योजना अंमलात आणली.

मध्यंतरी दुर्लक्षित झालेली योजना विद्यमान सरकारने पुढे चालविण्याचा ध्यास घेतला. त्याकरिता राज्यात २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेऊन योजनेला बळकटी देण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र सदर योजनेचा ग्रामपंचायत स्तरावर बट्याबोळ करण्याचा गंभीर प्रकार वणी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीने केला आहे.

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अंतर्गत शिरपूर ग्रामपंचायतीला एक हजार २०० रोपे लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. सदर रोपांची लागवड सार्वजनिक ठिकाणी, रस्ते दुतर्फा, मंदिर परिसर, धार्मिक स्थळे, गायरान पडीक जमीन आदी ठिकाणी लावणे अपेक्षित होते. परंतु शिरपूर ग्रामपंचायतीने नेमकी किती रोपे लावली हे न उलगडणार कोडं आहे.

कारण मंगळवारी लागवडीअभावी सुकलेली रोपे ट्रॅक्टरमध्ये भरून गावातील तलावात फेकली. सदर प्रकार गावातील जागरूक लोकांच्या निदर्शनास आला. त्यामुळे गावात संबंधितांबद्दल चीड व्यक्त होत आहे. शासकीय योजनांचा कसा बट्याबोळ केला जातो हे यावरून स्पष्ट होते.

पर्यावरण संबंधित संभाव्य धोका टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वृक्ष लागवड योजनेतच जर संबंधित यंत्रणेकडून हलगर्जीपणा होत असेल तर योजनेचा उद्देश कसा सफल होणार, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.