ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगर पंचायत प्रभाग क्र. 3 मधे रस्ते चिखलमय झाल्याने प्रभागातील नागरिकांना येजा करणे कठिण झालं आहे. भर पावसाळ्यात लोकांना हा त्रास सहन करावा लागत असल्यानं नगरसेवकांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे.
सध्या प्रभाग क्रमांक 3 चे रहिवाशी रस्त्याच्या समस्येनं त्रस्त झाले आहे. सध्या पावसामुळे रस्त्यावर चिखल साचलं आहे. नगरसेवकांनी त्यांच्या कोट्यातून मिळालेल्या फंडमधून रस्त्यावर मुरूम टाकला आहे. असे नगरसेवकांचं म्हणणं असलं, तरी रस्त्याची दुर्दशा पाहिली की हा दावा फोल ठरलेला दिसतो.
शहर विकासासाठी बांधकाम विभागाकडे गेल्या पाच महिन्यांपासून तीन कोटी रुपयांचा निधी पडून आहे. मात्र निष्क्रिय अधिका-यांमुळे या निधीचा उपयोग होत नाहीये. मारेगावातील अनेक प्रभागात, रस्ते चिखलमय आहे, सांडपाणी वाहणा-या नाल्यांची दुरवस्था आहे. मात्र आलेल्या निधीचा वापर करण्यासाठी प्रशासन कोणत्या मुहुर्ताची वाट पाहात आहे हा सवाल मारेगाववासी करत आहे.