जितेंद्र कोठारी, वणी: विद्युत खांबाचे टेन्शन वायरमध्ये विजेचा प्रवाह झाल्यामुळे शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कुर्ली शेत शिवारात 28 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. ऐन शेतीच्या हंगामात बैलाचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे बैल ठार झाला असून महावितरण कंपनीने पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार शिंदोला येथील मीना नामदेव निब्रड यांची कुर्ली गावात शेती आहे. त्यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीची लाईन असून शेतात जागोजागी विद्युत खांब लावण्यात आले आहे. 28 ऑगस्ट रोजी मीना निब्रड चा मुलगा सचिन हा बैल घेऊन शेतात डवरणी करीत होता. दरम्यान एका खांब्यातील टेन्शन वायरमध्ये बैलाचा पाय अडकला. टेन्शन वायरचा स्पर्श होताच बैलाला जोरदार शॉक बसला व तो जागीच ठार झाला. सचिनने याबाबत लगेच आपले भाऊ गौरव निब्रडला फोन करून माहिती दिली.
फिर्यादी गौरव नामदेव निब्रड, रा. शिंदोला यांनी तात्काळ शिरपूर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देऊन तक्रार नोंदविली. तसेच महावितरण कंपनीचे शिंदोला मंडळ उप अभियंता यांनाही माहिती देण्यात आली. शिरपूर पोलिसांनी पशु वैधकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून मृत बैलाचा घटनास्थळ पंचनामा केला. तसेच महावितरण अधिकाऱ्यांनीसुद्दा पंचनामा तयार केला.
महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून वीज वितरण अधिकाऱ्यांनी पीडित शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शिंदोला येथील नागरिकांनी केली आहे. घटनेची पुढील तपास बिट जमादार गुणवंत पाटील करीत आहे.
हे देखील वाचा: