भास्कर राऊत मारेगाव : तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात सर्वत्र डोळ्याची साथ पसरली आहे. ग्रामीण भागात डोळे येण्याची साथ वेगाने पाय पसरवत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु अद्यापतरी आरोग्यविभाग या आजाराकडे गांभीर्याने पाहत असल्याचे दिसून येत नाही.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. या काळात दूषित पाण्यामुळे विविध आजार उद्भवतात. अशातच डोळ्याची साथ सुद्धा डोके वर काढत आहे. तालुक्यातील अनेक भागात डोळे येणे हा प्रकार सुरु असून तालुक्यातील जवळपास सर्वच गावामध्ये डोळे येणारे रुग्ण आढळून येत आहे. काही गावांमध्ये कमी रुग्ण असले तरी यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
मारेगाव येथील सरकारी दवाखान्यात तसेच तालुक्यात एकही नेत्रतज्ञ चिकित्सक उपलब्ध नाही. पुरेशी उपचार सुविधा व औषध उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसुद्धा शहरातील खाजगी नेत्रतज्ञ डॉक्टरांकडून उपचार करीत आहे. त्यामुळ डोळे येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आरोग्य विभागाच्या निदर्शनास येत नाही.
डोळे येणे हा व्हायरल असून रुग्णांनी स्वतःच काळजी घ्यावी
डोळे येणे हा व्हायरल आजार आहे. ज्यांना डोळ्याचा त्रास आहे त्यांनी स्वतःचे डोळे स्वच्छ धुवावे. रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन डोळे तपासणी करून घ्यावी. तसेच डोळ्याचा ड्रॉप नेहमी टाकावा. हा त्रास दोन ते तीन दिवस राहणार आहे. आरोग्य विभाग अलर्टवर असून तालुक्यामध्ये आवश्यक तेथे शिबीर घेण्यात येईल तसेच गावागावात जनजागृती करण्यात येईल.
डॉ. अर्चना देठे (तालुका आरोग्य अधिकारी, मारेगाव)