सुशील ओझा, झरी: 1 सप्टेंबरपासून जर स्थानिक बेरोजगारांना नोकरीवर घेतले नाही तर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देत आंदोलकांनी निवेदनातून आत्मदहणाची परवानगी मागितली आहे. याबाबत ठाणेदार आणि तहसीलदार यांना आज शनिवारी निवेदन देण्यात आले. खासगी कंपनीचे अधिकारी राजकीय दडपणामुळे स्थानिक तरुणांना नोकरीवर घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान आज प्रहारचे जिल्हाध्यक्ष विलास पवार यांच्या नेतृवात आंदोलकांनी इस्पात कंपनीत धडक दिली.
बेरोजगार तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पवार हे आज शनिवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी 12 वाजता मुकुटबनला पोहोचले. त्यांनी आंदोलक तरुणांना घेऊन इस्पात कोळसा खाणीच्या मुख्य गेटवर धडक दिली. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मॅनेजरद्वारा निरोप पाठवला. मात्र त्यांनी अधिकारी नसल्याचे सांगण्यावर पवार प्रचंड संतापले. तसेच आम्हाला 11 वाजता भेटण्याची वेळ देऊन ते हजर का नाही ? असा संतप्त प्रश्न केला. यावेळी कोणताही अनुचित परिणाम घडू नये म्हणून मुकुटबन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
अखेर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून बोलणे झाल्यानंतर 1 सप्टेंबर पासून बेरोजगार मुलांची ट्रायल घेऊन रोजगाराची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे आश्वासन अधिका-यांनी दिले. जर 1 सप्टेंबर रोजी मुलांना नोकरीवर न घेतल्यास सर्व तरुण तहसील कार्यालया समोर आत्मदहन करणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली.
अशा आषयाचे निवेदन नायब तहसीलदार रामगुंडे व ठाणेदार अजित जाधव यांना आंदोलकांनी दिले. त्यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विलास पवार, प्रकाश म्याकलवार, आसिफ कुरेशी, अनिल मुजगुले, आझाद उदकवार, सुनील जींनावार, उमेश पोतराजे, अनुप धगडी, जयंत उदकवार, प्रदीप वैद्य, गजानन नगराळे, गजानन वासाडे, पंढरी पेटकर, राजू धोटे, गजानन आडे उपस्थित होते.
हे देखील वाचा: