जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील नवेगाव ते शिरपूर मार्गावर नाल्यावरील रपटा पावसामुळे वाहून गेल्याने गावात येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. रहदारीचा एकमेव मार्ग बंद झाल्याने तब्बल 180 लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिक गावातच अडकले आहे. नवेगाव येथे शाळा नसल्यामुळे येथील विद्यार्थी दररोज शिरपूर येथे शाळेत ये जा करतात. तसेच गावातील अनेक शेतकरी व कामगार कामानिमित्त दररोज शिरपूर व वणी येथे जात असते. फक्त एकावर्षापूर्वी बांधण्यात आलेला हा डांबरी रस्ता पाण्यात वाहून गेल्याने रस्त्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरपूर नवेगाव रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. अशी मागणी नागरिकाने केली आहे.