पुरुषोत्तम नवघरे, वणी: अहेरअल्ली येथे सुमारे दीड कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते मंगळवारी हे भूमिपूजन झाले. अहेरअल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच हितेश उर्फ छोटू राऊन यांनी रस्ते व पाणी योजनेबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ग्रां प अहेरअल्ली येथे जल जीवन मिशन कार्यक्रम 2021-22 अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा कामासाठी 90.52 लाख रुपये, जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत अहेरअल्ली येथील जोड रस्त्यासाठी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत. मंगळवारी दिनांक 23 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
या वेळी जेष्ठ समाजसेवक अशोक रेड्डी बोदकुरवार, सुरेश मानकर, खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष सुरेश बोलेनवार गावचे, सरपंच हितेश राऊत, उपसरपंच अनिल राऊत यांच्यासह ग्रामपंचायत अहेरअल्लीचे सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष दादाराव राऊत, सचिव अतुल सिर्तावार, तलाठी संग्राम गिते, शंकर केमेकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरपंच हितेश राऊत यांचा पाठपुरावा
अहेरअल्ली गावाचे सरपंच हितेश राऊत यांनी गावातील समस्येबाबत लोकप्रतिनिधी व वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. गावासाठी असणा-या योजनांची गरज लक्षात आणून दिली. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी देखील मागणीला तात्काळ हिरवी झेंडी दाखवली. पाणी आणि रस्त्याचे काम होणार असल्याने गावक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.