जितेंद्र कोठारी, वणी: विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्याना घेऊन भारतीय जनता पक्षातर्फे येत्या 4 फेब्रुवारीला ‘गाव तिथे धरणे’ आंदोलनची घोषणा करण्यात आली आहे. वणी येथील विश्रामगृहात 25 जाने. रोजी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ही माहिती दिली.
अतिवृष्टीमुळे बाधित शिंदोला व पुनवट मंडळाचा नुकसानभरपाई यादीत समाविष्ट करणे, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देणे, कृषी पंपाची विजतोडणी बंद करणे, भारनियमन बंद करणे व इतर समस्यांबाबत उप विभागीय अधिकारी यांना निवेदन दिले होते. परंतु शासनाने त्या मागण्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.
त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 4 फेब्रुवारीला विधानसभा क्षेत्रातील 150 गावातील ग्रामपंचायत किंवा हनुमान मंदिरासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय पिदूरकर, दिनकरराव पावडे, तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, संजय पिंपलशेंडे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, बंडू चांदेकर, शंकर बांदूरकर उपस्थित होते.