भास्कर राऊत, वणी: नातेवाईकाला भेटायला बाहेरगावाहून कारने येणा-या अचानक पेट घेतला. आज शनिवारी दि. 25 फेब्रुवारीला दुपारी 12 ते साडे 12 वाजताच्या दरम्यान मार्डा ते मुकटा दरम्यान ही घटना घडली. या घटनेत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.
बालाजी संभाजी लिपटे हे राजूरा येथील रहिवासी आहेत. ते आपल्या रेनो कंपनीच्या कारने (MH14 EU1963) मुकटा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी सकाळी निघाले होते. राजुरा येथून वरोरा मार्गे मारेगाव तालुक्यातील मुकटा येथे येताना मार्डा ते मुकटा दरम्यान वर्धा नदीवरील पॉव्हर प्लान्टच्या डॅमवर असलेल्या ब्रिजवर कारने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतला तेव्हा गाडीमध्ये 3 जण बसले होते.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे गाडीतील प्रवासी गोंधळले. प्रसंगावधान साधून चालकाने गाडी तात्काळ बंद केली. गाडीतील सर्व लोक बाहेर पडले. त्यामुळे अनर्थ टळला. परंतु लागलेल्या या आगीने मात्र वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. यात कारमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.
सध्या उन्हाळा सुरु झाला असून अति उष्णतेमुळे वाहनांना आग लागण्याचे प्रमाण वाढणार आहे. अशातच वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेऊन वाहणाची व स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.