भास्कर राऊत, मारेगाव: ऐन बहरात आलेली कपाशीची झाडे केवळ घरगुती वादातून उपटल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. ऐन शेतीच्या मध्याच्या हंगामात हे सर्व घडल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील हटवांजरी येथील शेतकरी किसन जानबा घोडाम (वय 42 वर्षे) यांचेकडे 7 एकर शेती आहे. त्यांची शेती हटवांजरी ते बुरांडा रस्त्याच्या कडेला आहे. त्यांनी दरवर्षी प्रमाणे आपल्या शेतामध्ये कपाशीची लागवड केलेली होती. सोमवारी दि. 23 ऑगस्टला नेहमीप्रमाणे ते शेतीची कामे आटोपून घरी गेले. त्यांचे घरी नातेवाईक विलास चंपत पुरके (वय 44) हे येऊन होते. या दोघांमध्ये घरगुती वाद होता. वाद विकोपाला गेला.
त्यानंतर रात्री पूरके याने घोडाम यांच्या शेतात जाऊन शेतातील कपाशीची झाडे उपटली असा घोडाम यांचा आरोप आहे. आज दि. 24 ऑगस्टला सकाळी घोडाम हे शेतामध्ये गेले. त्यावेळी त्यांना शेतातील एक एकर क्षेत्रामधील कपाशीची झाडे उपटलेली दिसली. हे पाहून शेतकऱ्याला धक्काच बसला. शेतीच्या ऐन बहाराच्या हंगामात शेतीचे झालेले नुकसान पाहून शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.
या प्रकरणी घोडाम यांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविच्या कलम 427, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंद केला. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी गणेश मॉल येथे भव्य लकी ड्रॉ योजना
वणीत लोढा हॉस्पिटलमध्ये रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे थाटात उदघाटन