शहरात ‘जनता गर्दी’… बाजारपेठेचा वेळ कमी केल्याने मुख्य बाजारपेठेत गर्दी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  जिल्ह्यात वाढत जाणा-या कोरनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर पावले उचलत बाजारपेठ उघडण्याच्या वेळेत बदल करण्यात आला. आधी हा वेळ स. 10 ते सं. 5 पर्यंत होता. मात्र नंतर हा वेळ कमी करून स. 10 ते दु. 2 वाजे पर्यंत करण्यात आला. मात्र शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक येथे बाजारपेठेचा वेळ कमी असल्याने नागरिक एकच गर्दी करीत आहे. मुळात बाजारपेठेत गर्दी होऊ नये यासाठी वेळ कमी केलेला असताना वणीकर मात्र याच वेळेत ‘जनता गर्दी’ दिसून येत आहे. आज तर गर्दीने लॉकडाऊनच्या काळातील गर्दीचा उच्चांक मोडला.

गांधी चौक हे शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. जीवनावश्यक वस्तू तसेच कपडे, किराणा, धान्य, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वस्तू, चप्पल, फळे, भाजीपाला अशा सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी विक्रीसाठी या बाजारपेठेला वणीकारांसह खेडेगावातून येणा-या नागरिकांची पहिली पसंती असते. मात्र लॉकडाऊनचा वेळ कमी केल्यावर गर्दी कमी होण्याऐवजी उलट गर्दीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडताना दिसत आहे.

नागपंचमीच्या खरेदीसाठी एकच झुंबड
शनिवारी दिनांक 25 जुलै रोजी नागपंचमी हा सण आहे. शनिवारी वणीतील बाजारपेठ बंद असते. त्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनीही या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत एकच गर्दी केली. दरम्यान त्यामुळे गांधी चौक, आंबेडकर चौक या परिसरात आज वाहतुकीची कोंडी दिसून आली.

निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज?
जिल्हा प्रशासनाने लोकांनी अधिकाधिक वेळ घरातच थांबावे यासाठी लॉकडाऊन कठोर करत बाजारपेठेचा वेळ तीन तासांनी कमी केला. लोकांनी या वेळेतच खरेदी करून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे व कोरोनाचा संसर्ग वाढू नये हा यामागचा उद्देश होता. मात्र या उद्देशाला हरताळ फासले जात असल्याचे चित्र वणीच्या बाजारपेठेत दिसून येत आहे. त्यामुळे बाजारपेठेचा वेळ वाढवून गर्दी टाळावी असाही एक मतप्रवाह शहरात दिसून येत आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…. (व्हिडीओ साभार – सुनिल तुगनायत)

Lead StoryLockdownmarketWani Market
Comments (0)
Add Comment