विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागत समारंभात त्यांनी वणी विधानसभेसाठी राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 22 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा त्यांचे वणीत आगमन झाले. सकाळी 10 वाजता त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. दु. 12 वाजताच्या सुमारास त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर वणीतील टिळक चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी राज ठाकरे यांनी वणीकरांशी छोटेखानी संवाद साधला. आपल्या महाराष्ट्रातील राजकारण चिखलमय झाले असल्याचे अनेकांना असं वाटतं की राज ठाकरे हे सहज बोलतात. मात्र, मी सहज कुठलीही गोष्ट बोलत नाही. आपण एकदा या राज ठाकरेच्या हातात या राज्याची सत्ता देऊन बघा. राज्य कसं हाताळलं जातं हे मी तुम्हाला दाखवून देईल. कायद्याची भीती काय असते, हे मी तुम्हाला दाखवून देईल आणि परत महिलांकडे बघण्याची कुणाची वक्रदृष्टी होणार नाही, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
श्रोत्यांचा एकच हशा..
राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी द्रोनच्या माध्यमातून मनसेच्या झेंड्याद्वारे अवकाशात अभिवादन केले जात होते. नेमकं राज यांचं भाषण सुरू असतानाच, त्यांच्या डोक्यावर हे द्रोन गिरट्या घालत होते, तेव्हा राज यांनी अरे थांबव रे बाबा.. असे म्हणत ते थांबवायला सांगितले. मात्र, तरीही त्याच्या गिरट्या सुरूच होत्या, तेव्हा ऑपरेटरकडे पाहत त्यांनी माणूस आहे का त्याच्यात, उतरेल ना व्यवस्थित?, इथं नाही ना येणार?. नाहीतर साहेब चुकलो, साहेब चुकलो म्हणून इकडेच यायचा, असे राज यांनी म्हटले, त्यावर एकच हशा पिकला.
या कार्यक्रमाला वणी तसेच ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व लोक उपस्थित होते. यात महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. राज ठाकरे यांच्या वणी दौ-यामुळे मनसेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने विधानसभेच्या लढतीत आणखी रंगत येणार आहे.