कोरपना: वणी-यवतमाळ-चंद्रपुर जिल्ह्याला जोडणाऱ्या वणी-चारगाव चौकी-कोरपना महामार्गाला राष्ट्रीय महामार्गात परावर्तित करुन चौपदरिकरण करण्यात यावे अशी मागणी वाहतुकदार व नागरिकांकडून होते आहे. सदर महामार्ग चंद्रपुर-वणी लोकसभा क्षेत्रातील गावाना जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. या मार्गाचे चौपदरीकरण झाल्यास चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपनापासून वणी पर्यंतच्या गावांना फायदा होणार आहे. वणी-कोरपना, राजुरा, जिवती भागातील गावे नागपुर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, उमरेड शहराशी थेट जोडली जातील. कमी अंतराचा वाहतुकीच्या दृष्टीने पर्यायी रस्ता उपलब्ध होईल.
हा महामार्ग वाढलेल्या वाहतुकीमुळे अपुरा पडतो आहे. वरोरा ते वणी महामार्गाचे अलीकडेच राष्ट्रीय महामार्ग क्र 930 मध्ये रूपांतरण करण्यात आले आहे. तेव्हा या महामार्गाला जोडणा-या कोरपना पर्यन्त हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात परावर्तित करावा. अशी मागणी होत आहे. सद्यस्थितित हा मार्ग चारगाव चौकी पासून 2 राज्य महामार्गात विभागला आहे.
सावगी-सानेफळ-रालेगाव-चारगाव चौकी-कुरई ते जिल्हा सीमा व पारवा-वेळाबाई-कुरई-कोरपना असा विभागाला जोडला आहे. त्यामुळे रस्त्याचे नियोजन बरोबर होत नाही. तसंच रस्त्याची दिवसेंदिवस अधिकच दुरवस्था होत चालली आहे. रस्त्यावर डाबरीकरण कमी असून खड्डे अधिक दिसतात. त्यामुळे या महामार्गाचे चौपदरीकरण करून त्याला राष्ट्रीय महामार्गात परावर्तीत करावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.