जितेंद्र कोठारी, वणी: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी सरकारच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपने देशभरात महा जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. मोदी सरकारने केलेल्या जन कल्याणकारी कामांची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडली जात आहे. वणी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मंगळवार 20 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारने राबविलेली विविध योजनांची माहिती पत्रकारांना दिली.
अयोध्येत भव्य असं श्रीराम मंदिराचे निर्माण, जम्मू काश्मीर मधून कलम 370 रद्द करणे, पीएम किसान सन्मान निधी योजना लागू करून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये सन्मान निधी थेट खात्यात जमा करणे, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 4 कोटी पक्के घरे बांधून दिले, उज्ज्वला योजने अंतर्गत देशातील 9.59 लाख ग्रामीण महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन माता भगिनीच्या डोळ्यात येणारे अश्रू पुसण्याचे काम मोदी सरकारने केले. असे आ. बोदकुरवार म्हणाले.
49.82 कोटी जन धन खात्यांमध्ये थेट रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली. जलजीवन मिशनच्या माध्यमातून 11.66 कोटी घरात नळ कनेक्शन देण्यात आले. ग्रामीण भागात शौचालय बांधकाम, आयुष्मान भारत योजनेतून 38.91 कोटी नागरिकांना 5 लाखाचा आरोग्य विमा, देशात नवे विमानतळ, वैधकिय महाविद्यालयांची निर्मिती, महानगरात मेट्रो रेल सेवा, रेल्वेचा विस्तारीकरण, देशात रस्ते व उड्डाणपुलाचे जाळ इत्यादी विविध कामाची माहिती आमदार बोदकुरवार यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.
2014 मध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारे जनतेने पुन्हा 2019 मध्ये भाजपला भरभरून मते देत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदी बसण्याची संधी दिली. मात्र, यामध्ये त्यांनी सुरु केलेल्या काही महत्वाच्या लोककल्याणकारी योजनांचाही वाटा होता. त्यामुळेच भाजप घराघरात पोहोचली. मोदी यांच्या कारकिर्दीवर विरोधी पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. पण, आपल्या अनेक योजनांद्वारे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले. त्याचाच फायदा त्यांना पुढील निवडणुकीत झाला आणि सलग दोन वेळा मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाले. असे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, रवी बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, महादेवराव खाडे व पत्रकार उपस्थित होते.