जितेंद्र कोठारी, वणी: शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी, ट्रॅक्टर व ऑटोची बॅटरी चोरी, घरफोडी, विनयभंग, चिडीमारीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अशा गुन्हांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांना अटक करता येत नाही. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगार स्थानिक पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
शहरातील खरबडा मोहल्ला, रंगनाथ नगर, दीपक टॉकीज चौपाटी, तैलीफेल, व इतर झोपडपट्टी परिसरात बाल गुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. विभक्त कुटुंब आणि आई-वडिलांना असलेले दारू-अमली पदार्थांचे व्यसन यांचा परिणाम मुलांवर होतो. संस्कारांचा अभाव आणि वाईट संगतीमुळे अनेक मुले वाममार्गाला लागत आहेत. काही केवळ शौक म्हणून चोरी, घरफोडी तसेच दुचाकी चोरण्यासारखे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले.
व्यसनाची पूर्तता करण्यासाठी किंवा मोबाईल, कपडे, घड्याळ, बाइक किंवा अन्य चैनीच्या वस्तू मिळविण्यासाठी मुले चोरी करण्यास धजावतात. गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान अशा मुलांना ताब्यात घेतल्यानंतर पालकांना बोलावून घ्यावे लागते. अशा मुलांना बाल न्यायमंडळासमोर हजर केले जाते. 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा विधिसंघर्षग्रस्त बालक असा उल्लेख केला जातो. त्यांना कायद्याने मोठे संरक्षण दिले आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीशहरात अल्पवयीन मुलांमध्ये हाणामारीच्या घटनासुद्दा बघायला मिळत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी येथील एका नामांकित शाळेतील नववी आणि दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यामध्ये शाळा सुटल्यावर तुफान राडा झाला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. मात्र पालकांना बोलावून समज देण्यात आली.
अर्धा तासात दुचाकीला केले जाते बारीक
शहरातून चोरी गेलेल्या दुचाकी वाहनांचे सर्व पार्टस वेगळे करुन भंगाराच्या दुकानात विकले जातात. पूर्वी चोरीच्या दुचाकी बारीक करण्यासाठी आदीलाबाद, चंद्रपूर, नागपूर येथे नेली जात होती. मात्र अलीकडे गॅरेजवर काम करणारे काही अल्पवयीन मुलं चोरी केलेल्या दुचाकी गाड्याना जंगलात नेऊन अर्ध्या तासात सर्व पार्टस वेगळे करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा: