सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: स्थानिक नटराज चौक येथील बालाजींच्या रथाला तब्बल 350 वर्षांची परंपरा आहे. केदार परिवाराच्या गेल्या सात पिढ्यांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. अत्यंत महाकाय अशा रथाला वर्षातून फक्त एकदाच बाहेर काढले जाते. उत्तम दर्जाच्या लाकडापासून बनवलेल्या या रथाची अवस्था आजही चांगली आहे.
चैत्र महिन्यात देवीसोबत बालाजींचेही नवरात्र साजरे केले जाते. या मंदिरात बालाजींच्या नवरात्रात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होतात. दसऱ्याला विषेष पूजा होेते. या लाकडी रथाला स्वच्छ धुवून सजविले जाते. यात बालाजींची मूर्ती ठेवली जाते. या मूर्तीची शहरातून शोभायात्रा काढली जाते. दसऱ्याच्या दिवशी विशेष पूजा करण्यात येते.
बालाजींची मूर्ती ही हलविता येणारी आहे. दसऱ्याला विधीवत ही मूर्ती रथामध्ये विराजित केली जाते. लहान लेकरंदेखील या रथावर आरूढ होतात. गेल्या 350 वर्षांपासून वणीकरांच्या अनेक पिढ्या या बालाजीच्या दसरा उत्सवाचा आनंद घेत आहे.