जितेंद्र कोठारी, वणी: सध्या वणी तालुक्यात पुराने हाहाकार उडवला असून तालुक्यातील 11 गावांना पुराचा वेढा आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. झोला व कोना गावतील सुमारे एक हजार नागरिकांना सावरला येथील कॉलेजमध्ये त्यांचे पशुधनासह स्थलांतरित करण्यात आले आहे. तिथे त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. पूर परिस्थिती गंभीर होत असल्याने खबरदारी म्हणून राज्या आपत्ती व्यवस्थापनाच्या दोन टीम वणी तालुक्यात दाखल झाल्या आहेत. दरम्यान आज मंगळवारी दिनांक 19 जुलै रोजी जिल्हाधिकारी अमोल येगडे यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला. सध्या परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. तसेच गरज पडल्यास आवश्यक ती सर्व व्यवस्था करून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात येईल, असा दिलासा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना दिला.
वणी तालुक्यातील उकणी, जुनाड, शिवणी (ज), सेलू (खु), भूरकी, कवडशी, रांगणा, चिंचोली, सांवगी (नवीन), झोला, कोना गावांना पुराचा वेढा आहे. जिल्हाधिकारी यांनी रांगण येथून ड्रोन कॅमेरा द्वारे 11 गावातील पूर परिस्थिती पाहणी केली. त्यांनी सेलू येथील सरपंच यांच्याशी मोबाईल द्वारे चर्चा केली. पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांसाठी तसेच स्थलांतरित नागरिकांसाठी जेवण व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. तसेच त्यांनी कॉलेजमधील स्थलांतरीत नागरिकांची भेट देऊन संवाद साधला. दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाचे पथक छोट्या बोटीने कोना गावातील एका सिकलसेल रुग्णाला वणी येथे स्थलांतरित केले.
शेतीची नुकसान भरपाई देणार – जिल्हाधिकारी
आधी जीवित हानी वाचवण्याला प्राथमिकता देण्यात येईल. त्यानंतर शेती नुकसानीची भरपाई शासनाकडून देण्यात येईल. पुरात अडकलेल्या प्रत्येक गावासाठी एक तलाठी व एक मंडळ अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या दोन टीमही दाखल झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये.
– अमोल येडगे, जिल्हाधिकारी
यावेळी आमदार संजीव बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार निखिल धुळधर व संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा: