क्रुझरची दुचाकीला भीषण धडक, दुचाकीचालक ठार

मारेगावातील राष्ट्रीय विद्यालयसमोर अपघात

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव येथे एका भरधाव क्रुझर गाडीने दुचाकीचालकास जबर धडक दिली. यवतमाळ-वणी रोडवरील राष्ट्रीय विद्यालयासमोर आज दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक ठार झाला. पारितोष संजय गाथाडे (26) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारितोष संजय गाथाडे (26) हा तरुण सराटी ता. मारेगाव येथील रहिवाशी होता. मारेगाव येथे पिक अप या गाडीवर चालक म्हणून काम करतो. आज शुक्रवारी दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी पारितोष पिकअप गाडीने गावाहून मजूर घेऊन मारेगाव मध्ये आला होता. मजुरांना बांधकामच्या ठिकाणी सोडून त्याने खासगी कामासाठी एका परिचितांची सुझूकी (विना नंबर) ही दुचाकी घेतली. दुचाकी घेऊन तो राष्ट्रीय विद्यालयाजवळून मारेगावच्या दिशेने जात होता.

दरम्यान वणीच्या दिशेकडून क्रुझरी ही गाडी (MH31 BB6457) मारेगावकडे येत होती. दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास क्रुझरने पारितोषच्या दुचाकीला राष्ट्रीय विद्यालयाजवळ धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पारितोष हा उसळून खाली पडला व बेशुद्ध झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. सोबतच त्याच्या पायालाही गंभीर इजा झाली. रस्त्यावरच्या लोकांना पारितोषला उचलून ग्रामीण रुग्णालयात नेले. 

अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पारितोषचा अपघात झाल्याची माहिती मिळताच त्याचे नावेवाईक ग्रामीण रुग्णायलात आले. पारितोषला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अवघ्या काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती पारितोषच्या नातेवाईकांनी दिली. पारितोषच्या पश्चात एक लहान भाऊ, आई-वडील आहे. त्याचे वडील मजुरी करतात. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.

हे देखील वाचा:

विधवा महिलेचे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण

अखेर बुरांडा-खापरी रस्त्याच्या कामाला सुरूवात

गोरज येथील विवाहित तरुण 4 महिन्यानंतरही बेपत्ताच

विवाहितेला फेसबुकवर झाला प्यार… मुलगीही झाली, मात्र प्रियकराचा इन्कार

Lead Story