जितेंद्र कोठारी, वणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी राखीव असलेले गोडावन व्यापाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे उघड झाले आहे. शेतमाल तारण योजना सुरु करावी अशी मागणीचे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार बुधवार 17 नोव्हेंबर रोजी बाजार समितीत गेले होते. त्यावेळी बाजार समिती सचिव अशोक झाडे यांनी गोडावन रिकामे नसल्यामुळे शेतमाल तारण योजना सुरु करता आली नाही असे सांगितले. तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी गोडाऊन उघडून दाखवा अशी मागणी केली.
सुरुवातीला बाजार समिती सचिव यांनी गोडाऊन उघडले नाही. मात्र मनसे कार्यकर्ता आक्रमक होताच त्यांनी गोदामाचे शटर उघडले. बाजार समितीत शेतमाल तारण योजनेसाठी राखीव असलेले 200 MT क्षमतेचे 7 गोडावन पैकी गोडावन क्रमांक 2,5 व 6 हे खाजगी व्यापाऱ्यांना 70 हजार रुपये वार्षिक भाड्यावर देण्यात आलेले असून इतर 4 गोडावन मध्ये तारण योजनेचा मागील वर्षीचा थोडफार माल शिल्लक असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष यांच्या निदर्शनास आले.
शेतकऱ्याच्या हक्काचे गोडावन व्यापाऱ्याच्या घशात असल्याची बाब माहीत होताच मनसे कार्यकर्त्यानी बाजार समिती राडा केला. येत्या 7 दिवसात व्यापाऱ्यांकडून गोडावन रिकामे करुन घ्या, अन्यथा मनसे कार्यकर्ता आपल्या स्टाईलने आंदोलन करेल अशा इशारा देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर, शहराध्यक्ष शिवराज पेचे, शुभम भोयर, विलान बोदाडकर, लकी सोमकुंवर व इतर कार्यकर्ता होते.
काय आहे शेतमाल तारण योजना ..! शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक गाव पातळीवर शेतीतून निघालेला शेतमाल साठवणुकीसाठी पुरेशा सुविधा नसतात. त्यामुळे शेतीमालाचे काढणी नंतरच्या हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीमाल बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन येतात. त्याच वेळेला सर्वांचे शेतमाल एकत्र आल्याने शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. शेतकऱ्यांना शेतमाल साठवणून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास, त्या शेतमालास जास्त बाजार भाव मिळू शकतोआणि शेतकऱ्याला त्याच जास्त फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव आणि नफा मिळावा, या दृष्टीकोनातून विचार करून कृषि पणन मंडळाद्वारे 1990-91 पासून शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
शेतमाल तारण योजना फक्त शेतकऱ्यांसाठीशेतमाल तारण योजनेअंतर्गत फक्त शेतकऱ्यांनाच शेतीमाल तारण ठेवून कर्ज योजनेचा लाभ घेता येते. शेतकऱ्याने बाजार समितीकडे तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणुक, देखरेख व सुरक्षा जबाबदारी संबंधित बाजार समितीची आहे. शेतकऱ्याने तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्यादिवसाचे चालू बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल, ती ठरविण्यात येते. कर्जासाठी तारण ठेवलेल्या शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधीत बाजार समितीची आहे.