मागासवर्गीयांवर होणा-या अत्याचाराची सखोल चौकशीची मागणी

उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध धर्मीय व मागास वर्गातील लोकांवर अत्याचार होत आहे. राजकीय दबाव टाकून असे प्रकऱण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे जातीवरून झालेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करून आरोपींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांद्वारा निवेदनातून करण्यात आली. आज बुधवारी दिनांक 17 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

नागपूर जिल्हातील अरविंद बनसोडे संशयास्पद मृत्यू प्रकरण, पुण्यातील विराज जगताप हत्या प्रकरण, जळगाव जिल्ह्यातील दगडू सोनवणे , परभणी जिल्ह्यातील पाच बौद्ध तरुणांवर केलेला हल्ला, अहमदनगर जिल्ह्यातील राहुल अडसूड, बीड जिल्ह्यातील पारधी समाजाचे तिहेरी हत्याकांड व परभणी, जालना, औरंगाबाद बीड येथील बौद्ध व मागास समाजावर अत्याचाराच्या घटना अलिकडच्या काळात उघडकीस येत आहे.

यातील कोणत्याही प्रकरणाची योग्य ती चौकशी झाली नाही. शिवाय या गुन्ह्यातील अनेक आरोपींवर राजकीय वरहस्त असल्याने तपास होत नसल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा या आरोपींना अटक करण्यात व गुन्हाचा तपास करण्यात चालढकल करीत आहे. या घटनांचा तपास करून आरोपींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी मंगल तेलंग, कपिल मेश्राम, किशोर मून, भारत कुमरे, चेतन नगराळे, प्रथम तेलतुंबडे, राकेश, उल्हास पेटकर, प्रशिल तामगाडगे उपस्थित होते.

Dalit AtyacharDigital Anganwadi Lead storyLead Story
Comments (0)
Add Comment