”निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ” संत तुकाराम महाराजांच्या या उक्ती सांगतात की एखादे कार्य करताना अपयश येईल, मात्र दृढ निश्चयाने जर कोणते कार्य केले; तर ते नक्कीच तडीस जाते. हेच आपल्या कार्यातून दाखवणारे नेते म्हणजे संजय देरकर. अनेकदा अपयश आले. वाटेत खाच खळगे आलेत. मात्र संयम, लढाऊ वृत्ती आणि संघर्षी बाणा त्यांनी कधीही सोडला नाही.
संजय देरकर हे केवळ वणी विधानसभा क्षेत्र नाही तर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं नाव… अभ्यास… विविध विषयांचा व्यासंग… शांत स्वभाव मात्र बाणा लढाऊ… सर्वांशी सलोख्याचे संबंध… शेवटच्या घटकातील लोकांसाठी कुठल्याही प्रसिद्धीच्या मोहात न अडकता कार्य करणे, इत्यादी गोष्टींमुळे संजय देरकर हे नाव केवळ राजकीयच नाही तर सामाजिक, धार्मिक या क्षेत्रातही महत्त्वाचे ठरते. आज दिनांक 17 जानेवारी रोजी संजय देरकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा व्यक्तिविशेष लेख..
शेतक-यांचा प्रश्न असो… कष्टक-यांचा प्रश्न असो… किंवा सर्वसामान्यांचा प्रश्न असो… एक आशा म्हणून आजही संजय देरकर हे नाव सर्वसामान्यांना आधी आठवते. मजुरांचे आंदोलन असो किंवा शेतक-यांचे.. एखाद्या गावाची समस्या असो किंवा कुण्या गोर गरीबाची… प्रकल्पग्रस्तांची समस्या असो किंवा बेरोजगारीची, पूरग्रस्तांची समस्या असो किंवा दुष्काळग्रस्तांची…. त्यांनी कायम पीडित, गरजूंच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेत ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच संजय देरकर नावाचे गारूड आजही वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांवर अधिराज्य करीत आहे.
राजकारणाची सुरुवात…
राजकारणातील, समाजकारणातील एक सुपरिचित व्यक्तिमत्त असलेले संजय देरकर यांच्या राजकारणाची सुरूवात विद्यार्थी चळवळीतून झाली. कॉलेजमध्ये असताना विद्यार्थ्यांच्या विविध समस्या उचलून त्या तडीस नेण्याच्या कार्यामुळे एक युवा नेतृत्त्व म्हणून ते समोर आले. त्या काळात त्यांच्या ग्रामीण पॅनलचा कॉलेजच्या निवडणुकीत दबदबा होता. त्यांनी लढवलेली व त्यांच्या पॅनलद्वारा लढवल्या गेलेल्या निवडणुका त्या काळात चांगल्याच गाजल्या. पुढे त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करीत नगरसेवका पदाची निवडणूक लढली, ते जिंकले आणि पुढे नगराध्यक्ष देखील झाले.
नगराध्यक्ष बनल्यानंतर स्थानिक पातळीवरील नेतृत्व म्हणून संजय देरकरांचा उदय झाला. पुढे तरुण आणि दुस-या फळीतील कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवत, त्यांच्यातील नेतृत्व गुण पुढे येण्यासाठी त्यांनी नगरपालिका दुस-या फळीतील व तरुण उमेदवारांकडे दिली. त्यांच्या नेतृत्वात नगरपालिकेच्या अनेक निवडणूक लढवल्या गेल्या. त्यांच्याच नेतृत्वात दोनदा पालिकेत सत्ता देखील आली. तरुणांकडे सत्ता सोपवून त्यांनी आपले लक्ष विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले. काही कारणास्तव त्यांना यात विजय मिळवता आला नसला, मात्र त्यांच्यावर लोकांनी टाकलेला भक्कम विश्वास हे त्यांचे यशच म्हणावे लागेल.
विविध आंदोलनाचे नेतृत्त्व…
आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि मजुरांची समस्या आहे. शेतमालाचा भाव, पूर, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे परिसरातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. नुकसान भरपाई, पिकविमा इत्यादीसाठी त्यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली. दोन वर्षांपूर्वी वर्धा नदीला महापूर आल्याने अनेक गावे पुराखाली आली. संजय देरकर यांनी या भागात ठांड मांडून त्यांना आवश्यक ती मदत पुरवली. शेतक-यांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी त्यांनी विदर्भातील नामवंत कृषी अभ्यासक आणि संशोधकांना बोलवून मुकुटबन येथे कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते.
जसा शेतक-यांचा आपल्या भागात समस्या आहे. तसेच आपल्या भागात मोठ्या प्रमाणात खासगी कंपनी असल्याने कामगारांच्या देखील मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. खासगी कंपनी कामगारांचे कायम शोषण करीत आले आहे. या अन्यायाविरोधात कामगारांनी संजय देरकर यांच्याकडे धाव घेतली व संजय देरकर यांना नेतृत्त्व करण्याचे आर्जव केले. त्यांनी कामगारांच्या आर्जवाचा मान ठेवत वेळोवेळी या कामगारांचे नेतृत्त्व केले व त्यांना न्याय मिळवून दिला. गेल्या महिन्यातच त्यांनी ट्रान्सपोर्ट चालकांच्या विविध मागण्यासाठी असलेल्या आंदोलनाचे संजय देरकर यांनी नेतृत्व करीत चालकांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यात मोलाची भूमिका बजावली.
उद्योग, व्यवसाय यामुळे रोजगार निर्मिती होते. आपल्या भागात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती, विविध खाणी असल्याने आपल्या भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र हे भांडवलदार स्थानिक तरुणांना रोजगार देण्याऐवजी परप्रांतिय उमेदवारांना रोजगार देतात. याविरोधात सुशिक्षित बेरोजगार यांनी वेळोवेळी आवाज उठवला. मात्र त्यांच्या मागणीकडे मुजोर कंपनीचालकांनी दुर्लक्ष केले. पुढे या बेरोजगार तरुणांच्या आंदोलनांचे नेतृत्व संजय देरकर यांनी करीत खासगी कंपनीविरोधात वेळोवेळी आवाज उठवला व कंपनी व्यवस्थापकांना स्थानिकांना रोजगार देण्यास भाग पाडले.
अलिकडेच त्यांनी सहकार क्षेत्रात एन्ट्री केली. आपल्या जिल्ह्यातील एक महत्त्वाची सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ते उभे राहिले. इथे ही त्यांनी विजय तर मिळवला. शिवाय या बँकेच्या उपाध्यक्षपदाची माळ देखील त्यांच्या गळ्यात पडली. त्यावरून त्यांचे जिल्ह्यातील महत्त्व अधोरेखीत झाले.
नुकतेच शिवसेना पक्षात उभी फूट पडली. संजय देरकर सारखा लोकनेता आपल्या गटात आला तर त्याचा गटाला मोठा फायदा होईल हे लक्षात घेऊन त्यांच्यावर दुस-या गटात जाण्यासाठी दबाव टाकण्यात आला. प्रसंगी त्यांना विविध प्रलोभन आणि पदाची लालचा दाखवण्यात आली. मात्र त्यांनी कोणत्याही परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत त्यांचे कार्य सुरू असून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून देखील सध्या त्यांचे नाव चर्चेत आहे.
राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र अथवा धार्मिक क्षेत्र… माणसांनी कायम ध्येयवेडं असलं पाहिजे. यात यश-अपयश या गोष्टी सुरूच राहतात. मात्र विजय आला तर त्याचा उन्माद न करता, किंवा अपयश आले तर न खचता कार्य केलं की ते क्षेत्र ही आपोआप गतीमान होते. हेच संजय देरकर यांनी आपल्या कृतीतून आजपर्यंत दाखवले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वणी बहुगुणी तर्फे कोटी कोटी शुभेच्छा… 💐💐