पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज वणी शहरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात काढण्यात आलेली तिरंगा रॅली ही आजचे प्रमुख आकर्षण ठरले. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी निघालेल्या या तिरंगा रॅलीने वणीकरांचे लक्ष वेधले. अमृत महोत्सव समितीच्या वतीने ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत वणीतील सर्व राजकीय, सामाजिक संस्था तसेच शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते.
सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास शासकीय मैदानावर सर्व एकत्र आले. सर्वप्रथम इथे सहभागी लोकांना तिरंगा वाटप करण्यात आले. वणीतील प्रमुख प्रशासकीय अधिकारी व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून व बलून सोडून रॅलीला सुरूवात झाली. सर्वात आधी घोडे, त्यानंतर पिकअप गाडी, ट्रॅक्टर, बाईक घेऊन ही रॅली निघाली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. रिमझिम पाऊस असला तरी यावेळी रॅलीमध्ये सहभागी लोकांचा उत्साह दिसत होता.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, गांधी चौक, गाडगे बाबा चौक, जत्रा मैदान, भगतसिंग चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, टागोर चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, साई मंदिर चौक, बँक कॉलनी, विठ्ठलवाडी, एस.बी.लॉन, असे मार्गक्रमण करीत शासकीय मैदानावर पोहोचली. इथे राष्ट्रगीत घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीनंतर उपस्थितांना विजय चोरडीया यांच्या तर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. रॅलीमध्ये 500 ते 600 लोकांचा सहभाग होता.
यावेळी रवी बेलूरकर, राजाभाऊ पाथ्रडकर, राजू उंबरकर, विजयबाबु चोरडिया, राकेश खुराणा, नितिन शिरभाते, गणपत लेडांगे, रज्जाक पठाण, राजू तुराणकर, सुधीर साळी, पौर्णिमा शिरभाते, आरती वांढरे, विजया आगबत्तलवार, अॅड, प्रविण पाठक, अमित उपाध्ये, राजु गव्हाणे, आशिष डंभारे, पंकज कासावार, फाल्गुन गोहोकार यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, महिला, पत्रकार इत्यादींची उपस्थिती होती.
हे देखील वाचा:
वणीत 15 ऑगस्टला ‘वंदे भारत- एक शाम देश के नाम’ हा भव्य दिव्य कार्यक्रम