जितेंद्र कोठारी, वणी: महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न, महिला अत्याचार, धार्मिक विद्वेष याला जनता कंटाळली आहे. पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली तर केंद्रातून आणि राज्यातून भाजपचा सुपडा साफ होणार, असा घाणाघात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण देशमुख यांनी केला. मंगळवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी वणीतील शेतकरी म़दिरात जनसंवाद यात्रेचा समारोप झाला. या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वामनराव कासावार यांची उपस्थिती होती. 5 सप्टेंबर रोजी झरी येऊन निघालेल्या जनसंवाद यात्रेचा म़गळवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी वणीत शानदार समारोप झाला. त्यानिमित्त वणीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीने वणीकरांचे लक्ष वेधून घेतले.
समारोपीय भाषणात प्रवीण देशमुख म्हणाले की केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार विरोधात प्रचंड संताप आहे. जेवढे नेते काँग्रेसमध्ये आहे, तेवढे कार्यकर्ते देखील इतर पक्षामध्ये नाही. मात्र नेते एकसंघ नसल्याने त्याचा भाजपला फायदा होत आहे. एकजूट दाखवल्यास ग्रामपंचायतीमध्येही भाजप दिसणार नाही, असे प्रतिपादन देशमुख यांनी केले. वामनराव कासावार यांनी गावखेड्यात, शहरात मोदी सरकार विरोधात प्रचंड संताप असून यावेळी मतदार आपली चूक दुरुस्त करणार आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन आपल्या भाषणातून केले.
जनसंवाद रॅलीचे प्रत्येक गावात रॅलीचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी पक्षप्रवेश झाले. जनसंवाद यात्रेचा हा समारोप नसून ही एक नवीन सुरूवात आहे, जी पक्षाला नवी उभारी देणार, असे मत यात्रेचे मुख्य समन्वयक डॉ. महेंद्र लोढा यांनी व्यक्त केले. यावेळी आशिष खुलसंगे, राजीव कासावार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन घनश्याम पावडे यांनी केले तर उपस्थिता़चे आभार मारोती गोहोकार यांनी मानले. कार्यक्रमाला तिन्ही तालुक्यातील समन्वयक, पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. यात्रेमु़ळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून वणी विधानसभा क्षेतात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे.
बाईक रॅलीने वेधले वणीकरांचे लक्ष
वणी येथील रंगनाथ स्वामी मंदिरातून दुपारी 2 वाजता बाईक रॅली निघाली. या रॅलीत वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांच्या दुचाकीसह सहभागी झाले होते. वणीतील मुख्य मार्गावरून देशभक्तीपर गितांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली. चिखलगाव, गणेशपूर परिसर करून शेतकरी मंदिरात समारोप झाला. 250-300 दुचाकीच्या रॅलीनेे वणीकरांचे लक्ष वेधून घेतले.
भरत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून त्याच धर्तीवर काँग्रेसतर्फे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्रात दिनांक 4 सप्टेंबर रोजी झरी येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. झरी, मारेगाव आणि वणी अशा तीन तालुक्याचा दौरा करून या यात्रेचा मंगळवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी वणी येथील शेतकरी मंदिरात या यात्रेचा समारोप झाला.