विलास ताजने, वणी: मेंढोली ते वडजापूर पांदण रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी सदर शिवारातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी पांदण रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.
वणी तालुक्यातील मेंढोली ते वडजापूर हा दोन्ही गावांना जोडणारा पांदण रस्ता आहे. सदर शिवारात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची वहिवाट आहे. परंतु पावसाळ्यात पांदण रस्ता चिखलाने माखलेला असतो. त्यामुळे या शिवारातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी साधन, शेतमालाची वाहतूक करणे जिकरीचे होते. सध्या कापूस वेचणी, सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र सदर रस्त्याने बैलबंडी, ट्रॅक्टरची वाहतूक करणे कठीण आहे.
खराब रस्त्यामुळे शेतमालाची डोक्यावर ओझे घेऊन वाहतूक करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागतो. संबंधित विभागाने पांदण रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी दीपक बलकी, विजय एकरे, मोरेश्वर वासेकर, हरी पाचभाई आदी शेतकऱ्यांनी केली आहे.