विलास ताजने वणी : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफिसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे. मात्र अर्ज भरताना ‘थम्ब ‘ आधारशी जुळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावा लागत आहे.
वणी तालुक्यातील ग्रामीण भागात योग्य प्रकारे सर्व्हर चालत नाही. शेतकरी कर्ज माफिसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सेवा केंद्रात जात आहे. परंतु थम्ब आधारशी जुळत नसल्यामुळे सेवा केंद्रातून अनेक शेतकरी बांधवाना आल्या पावली परत जावे लागत आहे.
आधार काढताना डोळ्याच्या बुबुळचे आणि आंगठ्याचे स्कॅनिंग बरोबर झाले नसल्याने अडथळा निर्माण होत असल्याचे केंद्र चालक सांगतात. ऐन वेळी आधारच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. आधार मधील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी गर्दी होत आहे.
१५ सप्टेंबर पर्यंत आधार अपडेट झाले नाही तर अनेक शेतकरी कर्ज माफ़ीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्ज माफीचा अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी शेतकरी करीत आहे.