विवेक तोटेवार, वणी: उकणी गावातून बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांसह, सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी मनसेचे फाल्गुन गोहोकार यांनी गुरुवारी दिनांक 11 जुलै रोजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात धडक दिली. दरम्यान वणी-उकणी बससेवा त्वरित सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली. जर 8 दिवसात बससेवा सुरु झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासह अन्य कल्याणकारी योजना, चालू असलेल्या योजना व इतर कामासाठी विद्यार्थी व नागरिकांची सतत वणीत ये जा सुरू असते. तालुक्यातील उकणी या गावातील अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालयाकरिता वणीत येतात. परंतु दळणवळणाकरिता कोणत्याही सुविधा सध्या सुरू नाही.
बससेवा बंद असल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे वणी आगाराच्या वतीने दोनवेळा वणी ते उकणी ही बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. येत्या आठ दिवसात बससेवा सुरू करावी अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देते वेळी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, विलन बोदाडकर, धीरज पिदूरकर, आकाश नान्हे, सूरज काकडे, गोवर्धन पिदूरकर, प्रतीक उपरे, धीरज बगवा, गणेश भोंगळे, स्वप्नील कांबळे, राजू काळे, प्रवीण मांडवकर, प्रवीण कळसकर आदींची उपस्थिती होती.