ग्रामविकासाची शासकीय धोरणे रचनात्मक: ना. हंसराज अहीर

गिरीश कुबडे, बेलोराः गावाच्या विकासाच्या दृष्टीने सरकार चालवीत असलेली ध्येय धोरणे ही रचनात्मक आहे. त्यावर फार मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. आपला भाग हा संपूर्ण भारतात मोठा कोलबेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात जवळ जवळ तेवीस ते पंचवीस कोळसा खाणी असून फार मोठ्या प्रमाणावर कोळशाचे उत्खणन केल्या जाते. या कार्यासाठी बरीच जमीन अधिग्रहित करावी लागते. त्यासाठी शासन शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देऊन त्यांचे नुकसान होणार नाही यांची सतत काळजी घेत असते. सरकार लोकहीतांची बरीच कामे करत आहेत. त्यासाठी थोडा वेळही लागणार आहे. असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

 ग्रामजयंती निमित्त आयोजित उत्सवाच्या सायंकालीन सत्रात ते बोलत होते. दरम्यान रात्री होणाऱ्या रमेश लखमापुरे अभिनित, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘‘क्रांतिनायक’’ या नाटकाचेही यावेळी त्यांनी उद्घाटन केले. यावेळी स्वागताध्यक्ष सरपंच प्रकाश खुटेमाटे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील ललिता ताई भोंगळे, उपसरपंच आर्तिका राखुंडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भाऊरावजी लोडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश्वर भोंगळे, माजी सरपंच अमोल रेगुंडवार आणि नायगाव, निलजई, तरोडा, निवली येथील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

बेलोरा हे गाव वेकोलि पुनर्वसीत असल्याने येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पायाभूत सुविधांची कमतरता आहे. गावाचा परीसर मोठा असल्याने सोई सुविधा पुरविण्यात बऱ्याच अडचणी येतात. वेकोलिमुळे भूजल पातळी आणखी खोलात गेली आहे. त्यामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गावात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था निर्माण करण्यासंदर्भात निवेदन केले. तसेच वणी – चंद्रपूर या मुख्य रोडला जोडणारा पक्का रस्ता तयार करावा आणि अशी मागणी सरपंच प्रकाश खुटेमाटे यांनी केली.

कार्यक्रमाची नियोजनव्यवस्था राजेंद्र घोटकर, राजू राखुंडे, दिलीप भोंगळे, प्रवीण भोंगळे, राकेश जुनगरी व चमूने सांभाळली. संचालन गोपाल शिरपूरकर यांनी केले तर आभार दिवाकरजी भोंगळे यांनी मानले.

gramjayantiHansraj Ahir
Comments (0)
Add Comment