विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील हनुमाननगर येथे एका कडुलिंबाच्या झाडावर दोनदा वीज कोसळली. यात दुर्घटनेत अनेक घरातील विद्युत उपकरणे खराब झाले. दोन्ही वेळी गावक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी गावक-यांनी केली आहे. याबाबत आज गावक-यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.
सविस्तर वृत्त असे की शिदोल्याजवळील हनुमाननगर येथे विठ्ठल खंडू गोरे हे राहतात. यांच्या घराच्या अंगणात कडूलिंबाचे एक झाड आहे. या झाडावर गेल्या महिन्यात वीज कोसळली होती. यात अनेकांची विद्युत उपकरणे जळाली होती. याबाबत अहवाल सादर करण्यात आला होता. परंतु कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही.
अशीच घटना सोमवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री घडली. 8.30 वाजताच्या सुमारास त्याच झाडावर पुन्हा वीज कोसळली. यामुळे घरातील अंगणातील टीनाचे शेड कोसळले. तसेच परिसरातील अनेक घरांतील विद्युत उपकरणे जळाली. या घटनेचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याबाबतचे निवेदन 8 सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहे. सोबतच हनुमान नगर येथे विजरोधक टॉवर उभारण्याची मागणीही गावक-यांनी केली आहे.
निवेदनावर विठ्ठल गोरे, रविद्र गोरे, प्रवीण मेश्राम, राजेंद्र गोरे, गणेश कोडापे, रशीद सागर, नीलेश गोरे, रामदास कोडापे, सुधीर कंडे, रविंद्र पांगूळ यांच्यासह गावातील अनेकांच्या स्वाक्षरी आहेत.
हे देखील वाचा: