बसअभावी विद्यार्थ्यांची शाळेसाठी पाच किलोमिटर पायपीट

सुशील ओझा, झरीः तालुक्यातील मागुर्ला (बु.) येथे विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी रोज पाच किलोमिटर पायपीट होत आहे. यासाठी पालकांनी झरी-जामणीचे गटविकास अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना एक निवेदन सादर केले. यात विद्यार्थ्यांसाठी मानव विकास मिशनची बस सुरू करण्याची मागणी केली.

शासनाने विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून शाळेत येजा करण्यासाठी मानव विकास मिशनची बस सेवा विनामूल्य सुरू केली. यात ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत जाऊन शिक्षण घेऊ लागले. मात्र या बस सेवेमध्ये नियमितता नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्याकरिता मोठी अडचण अनुभवास मिळत आपले शिक्षण घेत होते. परंतु ही बस सेवा आजही ग्रामीण भागात पोहचली नसल्याचे दिसू लागले आहे.

मागुर्ला येथे 1 ते 4 वर्गापर्यंत जिल्हापरिषद शाळा आहेत. तर पुढील शिक्षणासाठी विध्यार्थ्यांना झरीजामनी या पाच कि. मि. अंतरावरील ठिकाणी जावे लागते. मात्र येथे जाण्यासाठी बस नसल्याने ते पायी प्रवास करून शिक्षण पूर्ण करीत आहे. या गावातून साधारणतः 35 विद्यार्थी झरीजामनी येथे पाच किलोमीटरचे अंतर पायदळ येऊन शिक्षण घेत आहेत.

ह्या बाबीची दखल घेऊन पालकांनी वणी आगार व प्रशासनाकडे मानव विकास मिशनची बस सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता अशी दोन वेळांत त्वरित सुरू करण्याची मागणी केली. सुरेश उईके, शंकर कोडपे, रामेश्वर किनाके, सोमेशर कोडपे, राजू आत्राम, दिलीप जुमनाके, भारत कोडापे, महेश कोरांगे, किसन चाहरे, गुलाब अरके, रणजित शेडमाके, शंकर सोयाम आणि पुंडलिक मेश्राम आदी पालकांनी हे निवेदन दिले.

Lead Storymanav vikas missionSchoolWaniZari
Comments (0)
Add Comment