खातेरा येथे वीज कोसळून 26 बक-यांचा मृत्यू

आज दुपारपासून तालुक्यात विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस

सुशील ओझा, झरी: खातेरा शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या बक-यांवर वीज कोसळल्याने 26 बक-यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 4 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या दुर्घटनेत 13 पशूपालकांचे सुमारे 3 ते 4 लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.

झरी तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा व तेलंगणा राज्याच्या सिमेवर खातेरा हे गाव आहे. आज दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3.30 ते 4 वाजता दरम्यान परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान खातेरा येथील शेरकी गावातील बकऱ्या घेऊन शेतशिवारात गेला होता. 4 वाजता सुमारास रमेश लसने यांच्या शेताजवळ बक-या चरत होत्या. दरम्यान बक-यांवर वीज कोसळळी.

या दुर्घटनेत सुधाकर पांडे यांच्या 5 बक-या, गेडाम यांच्या 4, रवि जूनगरी 3, विकास आगरकर 2, शंकर गायकवाड 2, बळीराम गोडे 2, दशरथ बुटे 2 तर नारायण भोयर, अंबादास वासेकर, दत्ता जुनघरी, दिवाकर भोयर, धर्मराज वाघाडे, अमोल सोनटक्के यांच्या प्रत्येकी 1 बकरीचा मृत्यू झाला. या अपघातात पशुपालकांचे सुमारे 3 ते 4 लाखांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच खातेरा गावाचे सरपंच विशाल ठाकरे, पोलीस पाटील राहुल गोडे, सचिन टाले यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व पशु वैद्यकीय अधिकारी यांना माहिती देऊन बोलविण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, जमादार मोहन कुडमेथे व जितेश पानघाटेसह डॉक्टर रवी गोडे व बळीराम गोडे पोहचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

या दुर्घटनेत पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी पशुपालकांतर्फे करण्यात आली आहे.

khateraLead Story
Comments (0)
Add Comment