विवेक तोटेवार, वणी: महाशिवरात्रीनिमित्त सुटी असल्याने पाटाळ्याच्या नदीवर फिरायला गेलेल्या मित्रांच्या गृपमधले 3 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. संकेत पुंडलिक नगराळे, अनिरुद्ध चापले, हर्ष चापले हे सर्व वणीतील विठ्ठलवाडी येथील रहिवासी आहे. वाहून गेलेल्या पैकी एक हा 10 व्या वर्गात शिकत असल्याची माहिती आहे. तर अनिरुद्ध आणि चापले हे दोघे चुलत भाऊ असल्याची माहिती आहे. आज महाशिवरात्रीनिमित्ताने हे चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी येथे फिरायला गेले होते. फिरल्यानंतर ते वर्धा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने एक मित्र बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी इतर मित्र मदत करायला गेले. यात तिघे ही वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. घडना घडताच त्याच्या सोबत असलेल्या इतर मित्रांनी याची माहिती परिसरातील लोकांना दिली. तसेच घटनेची माहिती वणी व माजरी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वणी येथील ठाणेदार अनिल बेहरानी हे स्टाफसह घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने काही काळ या तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अंधार झाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले. शनिवारी सकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर शोधमोहिमेला वेग येणार असल्याची माहित आहे.
(अधिक माहिती येताच बातमी अपडेट केली जाईल.)