जितेंद्र कोठारी, वणी: प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. हे प्रेमी युगुल कधीकधी धक्कादायक निर्णय घेतात. ज्यामुळं सगळेच अबोल होतात. आदिवासी बहुल झरी तालुक्यात मागील आठवड्यात अशीच घटना घडली. मंदा गाऊत्रे आणि नामदेव खडसे या प्रेमीयुगलानं आत्महत्या केली. या बातमीची शाई वाळते न् वाळते तोच गुरुवारी पुन्हा एका प्रेमीयुगुलानं झाडावर एकत्र फाशी घेतली. सलग झालेल्या आत्महत्यांनी झरी परिसर पूर्णतः हादरलेला आहे.
झरी तालुक्यातील माथार्जुन हे छोटसं गाव. तिथं मदन गुलाबराव मेश्राम राहतात. विवाहित माहेश्वरी आणि रोहित ही त्यांची दोन अपत्यं. रोहितनं गुरुवारी आपल्या प्रेयसीसोबत झाडाला गळफास लावून स्वतःच्याच शेतात आत्महत्या केली. या घटनेनं संपूर्ण झरी परिसर हळहळला.
रोहित मदन मेश्राम (22) उमदा आणि मेहनती तरुण. आपल्या वडलांसोबत गावीच राहायचा. त्यांच्यासोबत शेतीची कामं करायचा. नेहमीप्रमाणेच बुधवारी यांनी शेतात बरीच काम केलीत. संध्याकाळी आपल्या वडिलांसोबतच घरी परत आला. जवळपास रात्री साडेनऊ वाजता दोघांनी मिळून जेवण केलं आणि झोपलेत. रोहितचे वडील झोपेतून जागे झालेत. तेव्हा रोहित घरी दिसला नाही. तो कदाचित शेतात बैल चारण्यासाठी गेला असावा, असं त्याच्या वडिलांना वाटलं.
शहानिशा करण्याकरता वडील गोठ्यात गेलेत. तिथं त्यांना बैल गोठ्यातच बांधलेले दिसलेत. त्यांचे भाऊ जीवन हनुमंत मेश्रामदेखील नेहमीच शेतात बैल चारण्यासाठी जातात. सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान जीवन घाबरेघुबरे होऊन घरी आलेत. त्यांनी जे सांगितलं त्यामुळं मदन यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जीवन यांनी मदन यांना सांगितलं की, रोहित आणि एक अनोळख्या मुलीनं आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीनं गळफास लावून घेतला. तिथं गावातीलच रंजना नंदू टेकाम (20) आणि रोहित (22) यांचा मृतदेह लटकलेला होता.
रोहित आणि रंजना एकमेकांच्या प्रेमात होते. याच प्रेमसंबंधातून ते घरून निघून गेलेत. या प्रेमाला समाजमान्यता मिळेल की नाही याची त्यांना शंका असावी. यातूनच त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला असावा.