भास्कर राऊत, मारेगाव: रस्त्याच्या कामावेळी रस्त्याच्या कडेला मुरुमाऐवजी माती टाकण्यात आली. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने या रस्त्यावर सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे या रस्त्याने ये जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांसोबत नागरिकांचेही मोठया प्रमाणावर हाल होत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी हिवरा ते मूक्टा या रस्त्याचे काम करण्यात आले. या पावसाळ्यात पाण्याचे पाणी रस्त्यावर साचून सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यावर माती असल्यामुळे आणि त्यामध्ये पाणी साचल्यामुळे या रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. या रस्त्याने साधे चालनेही कठीण होऊन गेलेले असून या साचलेल्या पाण्यामधून रस्ता शोधणे जिकरीचे झालेले आहे.
रस्त्याची अशी अवस्था असून याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. सध्या शेतीचा हंगाम सुरु असून शेतामध्ये बियाणे, खत नेणे, तसेच इतर कामासाठी शेतकऱ्यांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी मूक्टा येथील नागरिकांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.
यावेळी अजय ताजने, दिगांबर ढवस, चंद्रभान दर्वेकर, सुनील झिले, गणेश ढवस, कवडू भडके, शंकर इनामे, सुधाकर गहाणे,शुभम झिले, आकाश ढवस धनराज बोरकर, सुनील भडके यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.