भास्कर राऊत, वणी: पोळ्याच्या मध्यरात्री म्हणजेच 14 सप्टेंबरला मारेगाव शहरातील माधव नगरी येथे चोरट्यानी सुमारे 15 ते 17 घरे फोडली. या घटनेला 15 दिवस उलटून गेले असले तरी अद्याप या प्रकरणी कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या माधवनगरी येथील रहिवाशांनी पोलीस ठाणे गाठत ठाणेदारांची भेट घेतली व चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
दिनांक 14 सप्टेबरच्या मध्यरात्री एकाच रात्री तब्बल 17 घरे फोडत संपूर्ण मारेगावतच नाही तर जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. यात माधव नगरातील तब्बल 10 घरे होती. यावेळी नागरिकांनी चोरीची रितसर तक्रार दाखल केली होती. परंतु या घटनेला 15 दिवस उलटून सुद्धा अजूनपर्यंत चोरीचा कसलाही मागमूस न लागल्याने माधव नगरातील नागरिकांनी पोलीस स्टेशनवर धडक देत पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांची भेट घेत घेतली.
शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली
मारेगाव शहरात झालेल्या चोऱ्या ह्या पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहे. त्यासाठी शहरात गस्त वाढविण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी दोन वेळा शहरात पेट्रोलिंग केली जात आहे. मारेगाव शहरातील काही संशयितांची नावे वरिष्ठांना पाठवण्यात आलेली आहे. यापुढे चोरीच्या घटना घडणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. सर्वानी फेरीवाल्यापासून सावध असावे. कोणतीही खरेदी दारावर न करता बाजारात किंवा दुकानात जाऊन करावी.
– जनार्दन खंडेराव, ठाणेदार मारेगाव पोलीस स्टेशन
यावेळी संजय खडसे, प्रेमा जुमडे, हेमराज गणेश कळंबे, अनिता हेमराज कळंबे, विजय गोविंदा झाडे, नंदिनी विजय झाडे,सुरेश नानाजी आत्राम,दुर्गा सुरेश आत्राम, मंगेश मनोहर गवळी, सुचित्रा मंगेश गवळी, सुंदरलाल दौलत आत्राम, रंजना सुंदरलाल आत्राम, संतोष मुकिंदा ठाकरे, नंदा संतोष ठाकरे, सुनंदा राजु कोळेकर, राजू भिमराव कोळेकर, बाबू आनंदराव काकडे, प्रांजली बाळू काकडे, सुनिल रामदास भोयर, रंजना सुनिल भोयर, राजु तुकाराम डवरे, संगिता राजु डवरे, प्रविण पी बदकी, चंद्रशेखर बोकडे, उज्वला बोकडे, दिपक नारायण उरकुडे, गणेश हरिभाऊ कनाके, रेखा गणेश कनाके यांच्यासहित अनेक नागरिक उपस्थित होते.