राज्यात पुन्हा सुरू होणार बैलगाडा शर्यत, रंगणार शंकरपटाचा थरार

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यती सुरू होणार आहे. या शर्यतीतील अडथळे आता दूर झाले आहेत. त्यासंबंधी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे जरी राज्यात पुन्हा एकदा बैलगाड्यांची शर्यत सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेनी बैलगाड्यांच्या शर्यतींच्या विधेयकाला मंजुरी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर जलिकट्टू खेळाला परवानगी देण्यासाठी तामिळनाडू विधानसभेने विधेयक मंजूर केले होते. त्याच पद्धतीने महाराष्ट्र विधानसभेने बैलगाडा शर्यती विधेयक संमत केले.आता बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या विधेयकास कायदेशीर मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशूसंवर्धन विभागाकडून अधिसूचना काढून नियम आणि अटी प्रसिध्द करण्यात येतील.

बैलगाडी शर्यतीदरम्यान बैलांना अतिशय निर्दयीपणे वागवण्यात येत असल्याने 2011 मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली गेली होती. तामिळनाडूतील जलिकट्टूप्रमाणे महाराष्ट्रात बैलगाडीच्या शर्यतींना परवानगी देण्यात यावी, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली होती.

(राज्यातील शासकीय कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा नाही)

प्राण्यांशी कौर्य प्रतिबंध विधेयक विधानसभेत एप्रिलमध्येच एकमताने मंजूर झाला आहे, यानुसार प्राण्यांचे हाल केल्यास 3 वर्षे तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंड ठोठावला जाणार आहे. पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्यामध्ये सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आल्याने आता बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला होता. या विधेयकात सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती.

CollectorPresidentVidhansabha
Comments (0)
Add Comment