रुग्णांचा जीव वाचवणा-या परिचारिकेलाच गमवावा लागला रक्ताअभावी जीव

परिचारिका प्रीती आत्राम यांना वेळेवर रक्त न मिळाल्यानं झाला मृत्यूू

गडचिरोली: परिचारिका रुग्नांचा जीव वाचवते. पण याच परिचारिकेवर केवळ रक्ताअभावी जीव गमावण्याची वेळ आली आहे. ही घटना आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील. इथल्या उपजिल्हा रुग्णालयात एनसीडी विभागात प्रीती आत्राम ही परिचारिका म्हणून काम करायची. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या, त्यांना रक्ताची गरज होती. मात्र त्यांना रक्त न मिळाल्यानं त्यांना जीव गमवावा लागला आहे. प्रीत आत्राम यांच्या मृत्यूने तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे की, प्रीती आत्राम सिकलसेल या आजाराने ग्रस्त होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिकलसेलच्या रुग्णांना तात्काळ रक्ताची गरज असते. प्रीती आत्राम यांनाही रक्ताची गरज भासली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्त उपलब्ध होते, पण त्यांना वेळेवर रक्त देण्यात आले नाही.

अनेक रक्तदान शिबिरात त्या रक्त गोळा करण्यासाठी सहभागी होत होत्या. रक्ताअभावी रुग्णाचा जीव जाऊ नये म्हणूान जीवाचे रान करीत रुग्णांपर्यंत रक्त पोहोचवत होत्या. मात्र त्यांच्यावरच रक्त न मिळाल्यानं जीव गमवण्याची वेळ आली. रक्तपेढीत रक्त उपलब्ध होते. मात्र त्यांच्यापर्यंत ते वेळेवर पोहोचवण्यात आले नाही. अखेरच्या क्षणापर्यंत त्या तडफडत राहिल्या. या परिचारिकेला वेळेपर्यंत रक्त न मिळाल्यामुळे अखेर मृत्यूला कवटाळावे लागले. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे या परिचारिकेला मृत्यू आल्यानं संताप व्यक्त केला जातोय.

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रमोद खंडाते म्हणाले की
रुग्णांबाबत आम्ही कधीच हेळसांड करीत नाही आणि प्रीती आत्राम तर आमच्याच विभागाच्या कर्मचारी होत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही असा दुजाभाव कसा करणार? त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही उपचार करण्यापूर्वी त्यांना स्थिर करणे आवश्यक होते. त्यांचे हिमोग्लोबीन अवघ्या पाचवर गेले होते. आम्ही त्यांच्यावर उपचार सुरू केले होती.

रक्ताची गरज भासली तेव्हा रक्तदेखील लावले. मात्र, आधीच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि त्या मृत पावल्या. त्यांना रक्त दिले नाही किंवा उपचारात हेळसांड केली, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रमोद खंडाते म्हणाले.

Hospital
Comments (0)
Add Comment