नंदिग्राम एक्सप्रेस कधी सुरु होणार? कोरोनापासून ट्रेन बंद

ट्रेन तात्काळ सुरु करण्यासाठी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे निवेदन

9

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नंदीग्राम एक्सप्रेस ही कोरोनापूर्वी वणी रेल्वे स्टेशनवर थांबत होती. कोरोना महामारीनंतर नंदीग्राम एक्सप्रेस बंद करण्यात आली. ही गाडी बंद झाल्याने वर्धा, नांदेड, मनमाड, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे ही ट्रेन तात्काळ सुरु करावी अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी स्टेशन मास्टर यांच्याद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

नंदीग्राम एक्सप्रेस सध्या आदिलाबाद वरून सुटत आहे. यापूर्वी ती नागपूरवरून सुटत होती, कोरोनापूर्वी नंदिग्राम एक्सप्रेस एक मिनीट थांबायची, असंख्य प्रवासी एका मिनीटामध्ये कसे रेल्वेत चढणार आणि उतरणार हा प्रश्न होता आता तर प्लॅटफॉर्मची लांबीही वाढली आहे.

मागील वर्षी काजीपेठ-मुंबई ही साप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली, दर शनिवारी ही ट्रेन आदिलाबाद नांदेडमार्गे मुंबईला जात होती. परंतु मागील दोन-तीन महिन्यापासून ती सुद्धा बंद आहे. वणी शहर हे औद्योगिक क्षेत्र आहे, शहराची वाढती लोकसंख्या बघता वणी रेल्वे स्टेशन हे महत्वाचे स्टेशन असून त्याचा विकास अमृत भारत योजनेतून व्हावा व एक्सप्रेस गाड्या जसे हैद्राबाद, मुंबई, निजामाबाद, पुणे, कोल्हापूर या चालणाऱ्या गाड्याचा थांबा वणी रेल्वे स्टेशनवर देण्यात याव्या या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पाठविण्यात आले.

यावेळी निवेदन देताना मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या नेतृत्वात विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, वणी विधानसभा भाऊसाहेब आसुटकर, यवतमाळ जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हनुमंते, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, सौ. सुमित्रा गोडे यवतमाळ जिल्हा महिला संपर्क प्रमुख, सौ. सुनिता काळे वणी तालुका महिला अध्यक्ष, व सौ प्रमिला चौधरी वणी शहर अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.