प्रयोगशील शेतकरी डॉ. दिलीप अलोणे यांना कृषी वैभव पुरस्कार

सेंद्रिय शेतीच्या प्रचार व प्रसारासाठी खुलताबाद येथे सन्मान

41

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्रयोगशील शेतकरी, शेती मित्र डॉक्टर दिलीप अलोने यांना नुकतेच कृषी वैभव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले खुलताबाद येथे स्वदेश बायोटेक यांच्या वतीने आयोजित सेंद्रिय शेती अभियान मेळाव्यात संस्थापक दिलीप देशमुख यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संतोष धुमाळे, सय्यद भाई, महेश पाटील, ज्ञानेश्वर जाधव, अशोक धोपटे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती.

यावेळी सुरेश वानखेडे, देविदास पडोळ, गोकुळ गीते यांना ही सन्मानित करण्यात आले. उत्पादन वाढीसाठी शेतीमध्ये भरमसाठ रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांच्या सातत्याने वापर होत आहे. त्यामुळे जमीन नापीक होत असून उत्पादन आणि मिळणारा भाव यामुळे शेतकरी अधिकाधिक आर्थिक कोंडीत सापडत आहे. दिवसेंदिवस तणनाशकाचा अघोरी वापर होत असल्यामुळे मातीतील पोषक जिवाणू आणि मित्र कीटकांची हानी होत आहे.

याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होत आहे. यासोबतच आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होत आहे. उत्पन्न वाढीसाठी आता सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय उरलेला आहे असे मत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर दिलीप अलोने म्हणाले.

या मेळाव्यात सेंद्रिय शेती करणारे महाराष्ट्रातील बहुसंख्या शेतकरी उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी राम खरात व निखिल यावलकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन करून सेंद्रिय शेतीचे महत्व विशद केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.