ब्रेकिंग न्यूज : वणी तालुक्यात पुन्हा पूर परिस्थिती उद्भवण्याचा इशारा

सततच्या पावसामुळे अपर वर्धा, निम्न वर्धा व इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

18

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. वणी तालुक्यात वर्धानदी व पैनगंगा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अपर वर्धा व लोअर वर्धा धरणातून वर्धा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर पैनगंगा नदीवरील इसापूर धरण 84 टक्के भरला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सततच्या पावसामुळे धरणात पाणीपातळीत वाढ होत आहे.

जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन विभाग यवतमाळ यांचेकडून 23 जुलै रोजी उपविभागीय अधीकारी व तहसीलदार यांना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी रात्रीपासून विदर्भात रिमझिम व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात स्थित उधर्व वर्धा प्रकल्पाच्या 3 गेट मधुन 40 से.मी. पाण्याचे विसर्ग वर्धा नदी पात्रात करण्यात येत आहे.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या 19 गेट मधून 50 से.मी. पाण्याचा विसर्ग वर्धा नदीत होत आहे. इसापूर धरणाची पाणीपातळी 813.21 दलघमी झाली असून क्षमतेचा 84 टक्का जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी या धरणातून पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
याच आठवड्या आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील हजारो नागरिक प्रभावित झाले. हजारो हेक्टर जमिनीवरील पिके उध्वस्त झाली. पूरामुळे वर्धा नदी काठावरील कोना, शेलु, रांगणा, भुरकी, सावंगी, कवडशी, जुनाड, वडा जुगाद व इतर पूरग्रस्त गावात जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. अशातच पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या इशाऱ्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचा वातावरण उत्पन्न झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.