वणीत पहाटेपासून पावसाचा कहर, शहरातील रस्ते पाण्याखाली

नदी, नाले ओव्हरफ्लो, अनेक गावांचा संपर्क तुटला

14

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात आज पहाटेपासून शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. स. 11 वाजेपर्यंत हा मुसळधार पाऊस सुरूच होता. वृत्त लिहे पर्यंतही पावसाच्या सरी सुरूच होत्या. अचानक आलेल्या धुवाधार पावसामुळे संपूर्ण वणीतील रस्ते पाण्याखाली गेले आहे. तर शहरातील अनेक वस्तींमध्ये पाणी गेल्याची माहिती आहे. नदी, नाले ओव्हरफ्लो झाले आहे तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर खबरदारी म्हणन वाहतूक विभागातर्फे मुख्य रस्त्यावर दोन पोलीस तैनान करण्यात आले आहे.

आज मंगळवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वाजतापासून शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे निर्गुडा नदी दुथडी वाहत आहे, तर गुंजच्या नाल्यावर 3 फूट पाणी वाहत असल्याने वणी-नांदेपेरा मार्ग बंद झाला आहे. वणी मुकुटबन मार्गावर पेटूरच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने राज्यमार्गावर वाहतूक खोळंबली आहे. शहरात अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वार्ड क्रमांक 9 येथे काळे ले आऊटमध्ये असे पाणी भरले आहे.

तालुक्यात कायर पठारपूर, रांगणा भुरकी, चारगाव वारगाव व इतर अनेक गावात जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यांमध्ये पूर आल्याने वाहतूक बंद होऊन संपर्क तुटल्याची माहिती आहे. वणी शहराला लागून असलेली निर्गुडा नदी दुथडी वाहत असल्यामुळे नगराध्यक्ष शहरातील विविध वस्त्यांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहे. नदी काठावरील वस्तीतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले आहे.

मुसळधार पावसाचा ग्रामीण भागातही कहर पाहायला मिळाला. वांजरी गावात सुद्दा अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे. मात्र नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन नायब तहसीलदार विवेक पांडे यांनी केले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्याप्रमाणात सोयाबीनची पेरणी केली असून अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

खबरदारी म्हणून वाहतूक विभागाचे दोन पोलीस बंदोबस्तावर आहेत.

नागरिकांनी सतर्क राहावे – विवेक पांडे
तालुक्यात अद्याप कुठेही मोठं नुकसान झाल्याची माहिती नाही. वांजरी गावात सुद्दा अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. अनेक ठिकाणी नदी नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून रस्ता किंवा पुल पार करू नये. नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी. कुठे काही अनुचित घटना झाल्यास प्रशासनाला त्याची माहिती द्यावी.
– विवेक पांडे, नायब तहसिलदार

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.