अवैध कोंबडी कटाई विरोधात राजूर कॉ. येथे आमरण उपोषण

चार महिन्यांपासून तक्रार करूनही ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष

0 652
बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉलरी येथे अवैधरित्या थाटलेल्या कोंबडी कटाईच्या दुकानांमुळे दुर्गंधी पसरली असून त्याबाबत चार महिन्यांआधी ग्राम पंचायतीला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतेही कार्यवाही न झाल्याने प्रवीण शेंडे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. दिनांक २७ जून पासून प्रवीण शेंडे आमरण उपोषणावर बसले असून जो पर्यंत कोंबडी कटाई चे दुकान हटत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे सांगितले आहे.
उपोषणकर्ते प्रवीण शेंडे यांचे भगतसिंग चौकात स्वतःचा मालकीचे हेअर सलून आहे. त्या शेजारी तौकिर सिद्दीकी यांचे दुकान आहे. हे दुकान त्यांनी सरवर सिद्दीकी यांना भाड्यावर दिले आहे. ह्या ठिकाणी सरवर यांनी कोंबडी कटाईचे कुठलीही परवानगी न घेता फेब्रुवारी महिन्यात व्यवसाय सुरू केला आहे. ह्या कोंबडी कटाईच्या दुकानामुळे पसरलेल्या दुर्गंधीचा व्यवसायावर परिणाम झाला असून त्यामुळे परिवारावर उपासमारीची पाळी आली, असे शेंडे यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात प्रवीण शेंडे यांनी ग्रापंला तक्रार केल्यानंतर ग्रापंने सरवर ला नोटीस बजावली होती. यावर सरवर याने एका महिन्याचे आत दुकान बंद करण्यात येईल असे लिखित दिले होते. परंतु एका महिन्याचा कालावधी लोटूनही दुकान बंद न केल्याने व संबंधित विभागाला वारंवार तक्रारी करूनही दुकान न हटल्याने प्रवीण यांनी दि २७ जून पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
प्रवीण शेंडे यांनी उपोषण सुरू करून तीन दिवस निघून गेल्यावरही ग्रापं काहीच कार्यवाही करताना दिसत नाही आहे. तर दुसरीकडे गावातील संपूर्ण न्हावी एकत्र आले असून त्यांनी प्रवीण शेंडे यांना समर्थन दिले आहे. त्याच प्रकारे कोंबडी कटाईचे दुकानदार सरवर सिद्दीकी यांनी गावात फक्त माझ्याच एकट्याचे दुकान नसून इतरही कोंबडी कटाईचे दुकान आहे. त्यामुळे केवळ माझ्यावर कार्यवाही न करता सर्वांवर कार्यवाही होऊन त्यांना ग्रामपंचायतीने पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी केली आहे. आता या संदर्भात राजूर ग्रापं काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.