टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे – खा. धानोरकर

नवनिर्वाचित खासदारांनी केली कंपनी अधिकाऱ्यांची कान उघडणी

0 1,688
विलास ताजने, वणी : वीज वाहिनीच्या कामासाठी पावरग्रीड कंपनी कडून शेतात टॉवर उभारले. मात्र संबंधित शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे वणी, झरी, मारेगाव, केळापूर, घाटंजी, आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांनी चंद्रपूरचे खासदार सुरेश धानोरकर यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली. यावेळी माजी मंत्री ऍड. शिवाजीराव मोघे, शिंदोलाचे सरपंच विठ्ठल बोंडे, लुकेश्वर बोबडे, प्रीतम बोबडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 
वारंगल ट्रान्समिशन लाईनचे काम वरोरा ते परळी, वरोरा ते हैद्राबाद असे दोन वर्षांपासून सुरू आहे. कंपनी कडून मनमानी कारभार करीत शेतात विद्युत टॉवर उभारले गेले. यात अनेकदा शेतकऱ्यांना पोलिसांचा धाक दाखवून मुस्कटदाबी करण्यात आली. परंतु शेतकऱ्यांना नुकसानीचा रास्त मोबदला दिला नाही. अनेकदा निवेदने देऊनही उपयोग झाला नाही. अखेरीस अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी खासदार सुरेश धानोरकर यांची भेट घेऊन योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मागणी केली.

सदर प्रकरणाची दखल घेत खासदार धानोरकरांनी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि कंपनी अधिकाऱ्यांकडे केली. यासाठी संबंधितांना पंधरा दिवसात प्रकरण निकाली काढण्याची तंबी दिली. यावेळी खासदार धानोरकरांनी कंपनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची चर्चा आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.